उदगीर / प्रतिनिधी
उदगीर तालुक्यात आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीचा माहौल चांगलाच रंगू लागला असून प्रभाग क्रमांक 20 मध्ये निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार जनसंपर्कात सक्रिय झाले आहेत. मात्र याच प्रभागात मतदारांमध्ये एक वेगळीच चर्चा जोर धरत आहे. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून या प्रभागातून भाजपाचे नगरसेवक निवडून येत असले तरी यावेळी मतदारांच्या अपेक्षा बदलल्या असल्याचे स्पष्टपणे जाणवते. बहुसंख्य मतदार स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य देण्याची भूमिका मांडत आहेत. “स्थानिक व्यक्तीला तिकीट दिल्यास आम्ही एक रुपया खर्च न करता त्याला निवडून देऊ. बाहेरून येणारे किंवा पैशावर आधारीत उमेदवार आम्हाला मंजूर नाहीत,” असा स्पष्ट सूर प्रभागातील मतदारांमध्ये उमटत आहे.
याच अनुषंगाने परिसरात आणखी एका मुद्द्याची चर्चा वाढताना दिसत आहे. काही मतदारांमध्ये ‘भूमाफिया’ हा शब्द चर्चेत असून, बाहेरून येणारे काही उमेदवार आर्थिक शक्तीचा वापर करून आपली बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप स्वरूपात उल्लेख केला जात आहे. जरी या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसली, तरी अशा चर्चेमुळे मतदारांमध्ये अस्वस्थता निर्माण होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, उमेदवार पायाला बाशिंग बांधून घरोघर भेटी देत असून जनसंपर्कात वेगाने वाढ होत आहे. पुढील काही दिवसांत उमेदवारी अर्जांची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने या प्रभागातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे. मतदारांचा बदललेला कल, स्थानिक उमेदवारांकडे वाढती झुकाव आणि ‘भूमाफिया’ या शब्दाभोवती चाललेली चर्चा यामुळे प्रभाग क्रमांक 20 मधील निवडणूक विशेष लक्षवेधी ठरणार आहे.