नांदेड :- उध्दव सरोदे -
रस्त्यावर उपेक्षित आयुष्य जगणाऱ्या निराधारांच्या चेहऱ्यावर पुन्हा आत्मविश्वास फुलवणारा “कायापालट” हा उपक्रम सोमवारी ७१ व्या महिन्यातही तितक्याच तळमळीने पार पडला.धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून ५३ भ्रमिष्टांना स्वच्छतेसोबतच सन्मानाचे जीवन मिळवून देण्यात आले.* केस-दाढी वाढून ओळखही पुसली गेलेली,अनेक महिने अस्वच्छतेत राहिलेली ही माणसे या उपक्रमामुळे अक्षरशः ओळखू न येण्याइतपत बदलली.मोफत दाढी-कटिंग,साबणाने स्नान,नवीन कपडे,चहा-फराळ व प्रत्येकी १०० रुपयांची बक्षिसी देत त्यांना “आपणही समाजाचा भाग आहोत” हा विश्वास देण्यात आला.गेल्या ७१ महिन्यांत ३,५०० हून अधिक बेघर, भिकारी व मानसिक आजारग्रस्त व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा हा उपक्रम आता नांदेडची सामाजिक ओळख ठरत आहे.मा.मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण,खा.डॉ.अजित गोपछडे, भाजपा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे,भाजपा अध्यक्ष अमरनाथ राजुरकर,डॉ.संतुकराव हंबर्डे,ॲड. किशोर देशमुख व लायन्स उपप्रांतपाल योगेश जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महानगर नांदेड,लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, सन्मित्र फाउंडेशन आणि अमरनाथ यात्रेकरू संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जातो.सुरेश शर्मा,अरुण काबरा,प्रभुदास वाडेकर, महेंद्र शिंदे यांनी शहरातील विविध रस्त्यांवरून योग्य लाभार्थ्यांची निवड केली.राजू अण्णा पुसनूर व प्रसाद या स्वयंसेवकांनी दाढी-कटिंग केली. स्नानासाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांनी केली. डॉ.अर्जुन मापारे यांनी मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार दिले तर स्नेहलता जायस्वाल,जयश्री ठाकूर व बाबुलाल यादव यांच्या हस्ते सर्वांना नवीन कपडे देण्यात आले.या कार्यक्रमा नंतर गोवर्धन घाट परिसराची स्वच्छता करून “स्वच्छता हीच खरी सेवा” हा संदेश देण्यात आला.येत्या मार्च महिन्याच्या पहिल्या रविवारी शहरात असहाय्य,मानसिक आजारग्रस्त किंवा उपेक्षित व्यक्ती आढळल्यास भाजप किंवा लायन्स क्लबच्या सदस्यांशी संपर्क साधावा, असे आव्हान संयोजक ॲड.दिलीप ठाकूर यांनी केले आहे.